अन्नधान्य, कपड्यांसह गरजेच्या वस्तू घेऊन मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना, आरक्षण घेऊनच परत येण्याचा निर्धार
                                             
                                                Xtreme News India  
                                            
                                                20-01-2024 15:06:58  
                                                
                                                36703 
                                        
                                        
                                            अन्नधान्य, कपड्यांसह गरजेच्या वस्तू घेऊन मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना, आरक्षण घेऊनच परत येण्याचा निर्धार
 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत.
जालना (प्रतीनिधी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी मराठवाड्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांतून मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुंबईमध्ये किती दिवस आंदोलन चालेल हे माहीत नसल्यामुळे वाहनांमध्ये राहण्याची, अन्नधान्य, पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
एकट्या मराठवाड्यातील लाखो मराठे मुंबईत दाखल होणार आहेत. नांदेड, लातूर, बीड, हिंगोलीसह, परभणीतील मराठा आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. हिंगोलीच्या कुरुंदा गावांमधून 400 ते 500 मराठा समाज बांधव रवाना झाले आहेत. गावकऱ्यांनी वाजत गाजत या सर्व मराठा बांधवांना आंदोलनासाठी पाठवले आहे.
मनोज जरांगे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट
परभणीच्या मराठा बांधव अंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट घालून, भगवा रुमाल घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे तरुण आंतरवालीमार्गे मुंबईकडे रवाना झालेत. तर, आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा निर्धार या तरुणांनी केला आहे. नांदेड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यासोबत पायी रॅलीमध्ये सहभागी होऊन हे आंदोलक मुंबईपर्यंत प्रवास करणार आहेत. तसेच, 26 तारखेपासून सुरु होणाऱ्या आझाद मैदानावरील उपोषणात देखील तरुण सामील होणार आहेत.
तीन टप्प्यात आंदोलक मुंबईकडे रवाना
लातूर जिल्ह्यातून 30 हजारापेक्षा जास्त मराठा बांधवांनी आंदोलनात सहभ घेतला आहे. हे आंदोलक तीन टप्प्यात मुंबईकडे रवाना होताना दिसत आहेत. ज्यात पहिल्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर आंतरवली सराटीतून, दुसऱ्या टप्प्यात लातूरवरून थेट पुण्याला जाणारी एक टीम असेल, तर काहीजण थेट मुंबईला दाखल होत होणार आहे. जरांगे पाटील यांच्या लढ्यात आम्ही साथ देणार असूनम, मुंबईहून आरक्षण घेऊन येणार असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत. सरकार आरक्षण प्रश्नावर वेळ काढूपणा करत असून, आता कोट्यावधी मराठे मुंबईत गेल्यावर जो प्रश्न निर्माण होईल त्यालाही सरकार जबाबदार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
                                            
                                         
                                       
                                          Contact For News & Advertisement.